तुमसे बडा कोई ताकदवर नहीं..

TheMindTalks
3

तुमसे बडा कोई ताकदवर नहीं..

 

काल रविवारी मी आणि माझा लेक अथर्व K.G.F. हा हिंदी सिनेमा बघत बसलो होतो.. तो संपल्यावर सहज गप्पा मारत बसलो, त्याच्या एका समवयस्क मित्राचा विषय निघाला. 

अथर्व : "अगं तो माझा मित्र खूप चांगला आहे,पण त्याचा स्वभाव खूपच हट्टी आहे, मी त्याला समजावून सांगतो की एवढा हट्ट चांगला नाही..  त्याला हे कळते पण तो म्हणतो की तो खूप प्रयत्न करतो हट्ट न करण्याचा,पण जमत नाही. त्याची हट्ट करण्याची सवय जाणार नाही ..खरच का ग एकदा लागलेली सवय नाही जात  कधीच?"

ह्या प्रश्नाला उत्तर देताना थांबले.

RECBT च्या भाषेतउत्तर देणे शक्य नव्हते.. तेवढ्यात KGF चा हिरो च धावून आला...!!!

अथर्व ला म्हणाले : "आता आपण KGF बघितला ना, सांग बरं त्याच्यात तुला नेमकं काय आवडलं, कोणता डायलॉग आवडला?"
अथर्व : "तो कसा निडर आहे, परिणामाची पर्वा न करता सरळ भिडतो कशालाही...आणि त्याचे तत्वज्ञान, दुसरोंके बारे में मत सोच.. तुमसे बडा कोई ताकदवर नहीं!

काय जबरी हिरो आहे आणि डायलॉग पण.....!!! " इति अथर्व.



मी हाच धागा पकडून म्हणाले : तो रॉकी जे बोलला ना ते खरं आहे, तुमसे बडा कोई ताकदवर नहीं..!! पण हे कशाच्या बाबतीत! नुसतेच शारीरिक ताकदीसाठी नाही,हा डायलॉग तुमच्या आंतरीक, मानसिक ताकदीसाठी आहे...!!

मग नकळत मी विचार करू लागले .... 
तुमचे मन खूप ताकदवान आहे..
आणि सगळ्यात वेगवान पण..!!! 
अगदी गौतम बुद्धा पासून ते तुकाराम, रामदासापर्यंत सगळ्यांनी मनाचं आणि मानसिक ताकदीच्या सामर्थ्याचे वर्णन आपल्या साहित्यात वेळोवेळी केलंय..!

पण हेच मन तुम्हाला घडवू शकते आणि बिघडवूही पण शकते..!!!

मानसशास्त्राचा जनक समजल्या जाणाऱ्या सिगमंड फ्रॉइड ने मनाला iceberg - हिमनगाची उपमा दिलीय...!
हिमनगाचे एक टोक पाण्याच्या वर दिसते पण टोकाच्या 9 पट तो पाण्याखाली असतो आणि पाण्यावरून तो किती आत आहे याचा अंदाज लागत नाही..
तसेच मनाचे आहे.. 

"आपण रोजचे आयुष्य जगताना ज्या प्रतिक्रिया देतो वा रोजच्या जगण्यात येणाऱ्या घटनांना प्रतिसाद देतो ना ते हिमनगाचे वरचे टोक आहे.."

आपल्या प्रतिक्रिया वा प्रतिसाद हा पाण्याखाली असणाऱ्या हिमनगाच्या 9 पट भागावर आधारित आहे. आपण जे रोजचे आयुष्य जगतो त्यात आपले मन आपल्या भावना ह्या हिमनगासारखे फक्त एक टोक दाखवतात पण उरलेल्या 9 भागात आत खोल खूप काही साठवलेले असते...!!

यामधे कही महत्वाच्या गोष्टी म्हणजे:- 
कितीतरी रागाचे, 
तिरस्कारांचे फसवणुकीचे प्रसंग, 
अपराधीपणाची भावना, 
दुःख, 
काही आनंदाचे, 
सोहळ्याचे क्षण, 
कौतुकाचे प्रसंग 
सगळे सगळे तिथे असते.... 

त्यातून मनाचे बोट पकडून कधी काय वरती येईल काही सांगताही येत नाही..!!!!

एखाद्या संध्याकाळी अचानक फार पूर्वी ऐकलेल्या गाण्याची धून तोंडात खेळत राहते...!!
तर एखाद्या निवांत दुपारी अचानकपणे झालेला अपमान आठवतो.....!!

कधी फसवणूक आठवते तर कधी कामात असेल तरीदेखील एखादा गमतीशीर प्रसंग आठवतो...!!!

कधी कौतुकाचा क्षण आठवतो आणि चेहराभर हसू फुटते तर एखादी पूर्ण संध्याकाळ अल्लडवयातील विस्मरणात गेलेल्या एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वाने व्यापून जाते....!!

आता चेहरा आठवत नसतो पण काही आठवणींनी ती संध्याकाळ गुमसुम होऊन जाते...!!

नेहमी हे दिसुन येते कि सकारात्मक किंवा आनंद देणाऱ्या आठवणी पेक्षा नकारात्मक आठवणी जास्त त्रासदायक ठरतात 
आणि 
आपले मन हे नेमकं इथेच आपली नस ओळखते आणि आपल्याशी खेळते जो पर्यंत तुम्ही त्याला खेळवायला शिकत  नाही...!

मन हे नेहमी आयुष्यातील नकारात्मक घटनांनाच जास्त आठवत असते..

ज्या सकारात्मक घटना किंवा प्रसंग, आनंदाचे प्रसंग आहेत ना ते आठवणींच्या पृष्ठभागावर येऊन बुडबुड्या प्रमाणे लगेच विरतात...
पण ज्या दुःखदायक, नकारात्मक घटना आहेत त्या आठवणींच्या पृष्ठभागावर येऊन लाटांसारख्या धडकत राहतात आणि त्या लाटानुसार आपले भावनिक आणि मानसिक आंदोलने पण हेलकावे खात रहातात....!!!

पण म्हणून आपण हे मनाचे राज्य मान्य करायचं का? 
मनाने यावे आणि कधी ही आपल्याला वाटेल तसे झुलवावे? 
का? 
आपण ही आपल्या मनावर राज्य करू शकतोच की हे का नाही समजत ...?...!!!
 समजेल .. समजेल .. 

त्यासाठी गरज आहे फक्त थोडेसे कष्ट करायची आणि धीर ठेवायची . !!!! 

फार काही करायची गरज नाही, जेव्हा जेव्हा तुमचे मन तुम्हाला आठवणींच्या राज्यातून फेरफटका मारायला नेईल तेव्हा तुम्ही त्याचा हात पकडायचा .......आनंदाने मनसोक्त बागडायाचे.. ..
 पण 
ज्यावेळी ते तुम्हाला जे जे नकारात्मक दाखवायला लागेल तेव्हा त्याचा हाट झिडकारून दया ... 
आणि ते खरं आहे असे अजिबात मान्य करायचं नाही..!!! तुमचे मन जे सांगतेय त्याला बरा वाईट कुठलाच प्रतिसाद देऊ नका. 
जसे आपण टी व्ही वर एखादा कार्यक्रम बघताना, "हा थोडया काळा पुरता आहे आणि संपणारा आहे. मी ठरवणार आहे ना तो कार्यक्रम किती वेळ बघायचा, रिमोट माझ्या हातात आहे
अगदी असेच जेव्हा एखादया नकारात्मक घटनेच्या आठवाने जरी काही negative भावना निर्माण झाली, विचार आला तरी स्वत:ला सांगा "तो विचार /ती भावना खूप कमी काळ असणार आहे, आणि मी ठरवणार त्याला किती महत्व द्यायचं वा किती वेळ द्यायचा! हे कायम राहणार नाही संपणार आहे,शेवटी रिमोट माझ्या हातात आहे ..
आणि मनाला हात धरून प्रयत्न पूर्वक नकारात्मक  आठवणीकडून सकारात्मक आठवणींच्या बाजूला वळवायचं व तुमच्या चेहऱ्यावर पसरणारे हसू अनुभवायचे... हो  आणि हे पण तुमच्यावर आहे किती वेळ हा अनुभव ठेवायचा! 
रोज रोज असे मनाबरोबर खेळत राहिलात ना की तो जास्त कुठे भरकटणार नाही, उलट तुमचे बोट पकडून तुम्ही वळवाल तसे वळेल.

दुसरे म्हणजे दिवसातून किमान 10/15 मिनिटे सजगतेचे ध्यान. म्हणजे जे इकडे तिकडे भरकटतेय ना त्या अवखळ मुलाला एका जागी बसवणे.. आता ते बसणार आहे का एका जागी? मग द्या ना त्याला खेळणं.. आपला श्वास!

खोल दीर्घ श्वास आत घेणे आणि तेवढाच खोल दीर्घ श्वास बाहेर सोडणे. मनाला बजावून ठेवायचं की तू ह्या आत ,बाहेर जाणाऱ्या श्वासांवर लक्ष ठेव!

ह्यालाच आजच्या सायंटिफिक भाषेत mindfulness breathing म्हणतात.

अजून एक काम करायचं, जी काही रोजची ऍक्टिव्हिटी करत असाल ,मग ते जेवण करणे असो, walk असो, किचन वर्क किंवा काही वाचन, लेखन.. पूर्णपणे तिथंच concentration करायचे.मान्य आहे आपलं खट्याळ बाळ म्हणजे आपले मन ऐकणार नाही,पळणार जे करत आहे त्यापासून.. आणायचे परत परत त्याला present moment ला..चालू क्षणात,आणि नाहीच ऐकले तर लावायचे कामाला breathing exercise च्या!

ह्यामुळे होईल काय की मन आठवणी मध्ये जाऊन आल्यावर भावनांच्या लाटा उसळतील पण त्या लाटांवर surfing कसे करायचे ,लाटांवर आरूढ कसे व्हायचे हे तंत्र तुम्हाला अवगत होईल आणि सजगतेच्या ह्या अभ्यासाने मन तुमच्यावर राज्य करणार नाही ,तुम्हाला म्हणेल तसे वाकवणार नाही तर तुम्हीच मनाचे राजे होणार तुम्ही म्हणाल तसे मन वागणार..

 आहे की नाही बरोबर त्या हीरोचा - रॉकीचा डायलॉग..?? 
 - तुमसे बडा कोई ताकदवर नहीं - Rule your mind or it will Rule you..!!


रोहिणी फुलपगार
सायकॉलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट
+91 96049 68842


Post a Comment

3Comments

  1. Nice tai. It's telling more about our unconscious mind and it's way of thinking.it is inspiring me.

    ReplyDelete
  2. Love the way you explain... Its nice to read n ever be used to easy in our daily life n even i hv experience it works i believe.... ��

    ReplyDelete
Post a Comment